मन म्हणजे बुद्धी का ? मन म्हणजे भावना का ? हे मन आहे तरी काय ? दिसत नाही मग असते कुठे ? काही थांग लागत नाही या मनाचा.
मन चंचल आहे, उधळलेल्या घोड्या सारखं, विजेपेक्षा चपळ. नाही.. नाही .. मन दु:खी आहे, उदास आहे. मन आनंदी, उत्साही, प्रेरित आहे. हे मन आहे तरी काय ? ह्याला सहावे इंद्रिय म्हणतात. दिसत नाही मग असते कुठे ? मन म्हणजे बुद्धी आहे का ? मन विकारी आहे की विचारी ? मन म्हणजे भावना आहे का ? काही थांग लागत नाही या मनाचा. क्षणात इथे असते तर क्षणात तिथे. मनात असले तर सगळे होते. असं म्हणतात. पण मनात असते तरी होत नाही. असे का होते ? लहरी मनाचा थांग शोधावा असं माझ्या मनात तरी का आले ?
समुपदेशक म्हणून काम करतांना मला असे प्रश्न खुपदा विचारल्या जातात –
एकदा मानसशात्रज्ञानी एक प्रयोग केला. रहदारीच्या रस्त्यावर केळाचे साल टाकले. जाणारे येणारे त्यावरून घसरून पडावे हाच उद्देश. कोणी त्या सालावरून घसरून पडले की बघणाऱ्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. जेवढ्या प्रतिक्रिया मिळाल्या त्या प्रत्येकी वेगवेगळ्या होत्या. कोणी “अरेरे...”, कोणी “सांभाळून…”, तर कोणी फिदीफिदी हसायचे, कोणी शिव्या द्यायचे तर कोणी सल्ले... पडणारा आणि बघणारा दोघांच्याही प्रतिक्रिया भिन्नभिन्न स्वरूपाच्या मिळाल्या. तेंव्हा हे अनुमान काढले गेले की जसा घटनेकडे बघणाऱ्याचा दृष्टीकोन तशी प्रतिक्रिया.
माझ्या मनात हे आले, हा दृष्टीकोन तरी कसा तयार झाला ? हे दृष्टीकोन तयार होण्यामागे ही मनाचीच भूमिका ना !
मग असे लक्षात आले, जे जे पूर्वी संस्कार बुद्धीने मनावर केले त्याचा हा परिपाक ! आता बुद्धीने मनावर संस्कार केले म्हणजे काय ? बुद्धी योग्य अयोग्यतेचा निवडा करते. संस्कार थोडेच करते ? आहे ना गंमत ! आजूबाजूच्या निरीक्षणातून व्यक्ती नित्य काहीतरी शिकत असतो. हे त्याचे निरीक्षणातून स्वतःहून शिकणे म्हणजे बुद्धीने मनावर केले संस्कार !
एक गंमतशीर उदाहरण पाहू. (प्रत्येक) आई आपल्या (प्रत्येक) बाळाला नेहमी सांगते, “खोटे बोलणे वाईट असते बेटा, खोटे कध्धी बोलू नये.” एक दिवस दारावर साड्या विकणारा येतो. छान छान साड्या असतात. सोसायटीतल्या, आजूबाजूच्या सगळ्याच बायका साड्या घेतात. बाळाची आई पण १०००रु. ची साडी घेते. संध्याकाळी बाबा ऑफिस मधून घरी येतात. आई कौतुकाने साडी दाखवते.
बाबा - “अरे वा ! छान आहे”
आई - “१५०० रु. सांगत होता, मी १२०० रु.ला घेतली.”(विजयी मुद्रा आईची.)
बाबा (पुन्हा) - “अरे वा ! छान ! पण महाग वाटते ?
आई - “नाही नाही मार्केट मध्ये अजून महाग आहे.”
हे सगळे आमचे बाळ पाहत असते. आणि ‘खोटे बोलू नये, वाईट असते’ हे शिकवलेले ते विसरून जाते. त्याचं हे निरीक्षण त्याच्या बुद्धी वर एक संस्कार करतं.
आता पटले ना ! निरीक्षणातून बुद्धी मनावर संस्कार कसे करते. असे अनंत प्रसंग असतात. ह्यातून सकारात्मक, नकारात्मक असे अनेक दृष्टीकोण आपला आकृतिबंध तयार करत असतात. हे आकृतीबंध बरोबर बांधले गेले तर मन सुधृढ, निकोप होते. पण ते चुकीचे बांधले गेले की मन विकारी होते. ते प्रसंग भांडणाचे, नात्यामधील कलहाचे आर्थिक विवंचनेचे असतील. किंवा स्नेह, आदर, मित्रत्व, मुल्यांची जपणूक करण्यासाठी घरातील सदस्यांनी घेतलेल्या कष्टाचे असतील. अगदी हेच दृष्टीकोण त्याच्या आयुष्याचे गणितं मांडतात.
मनात निरंतर येणारे विचार हे सागरी लहरीसारखे येतात. बुद्धीच्या किनाऱ्यावर आदळतात आणि वापस जातात. कारण ते विचार असतातच लहरी...
पण सागराच्या खोल तळाशी, छोट्या छोट्या शिंपल्यात अनेक मोती असतात. ते मोती बौद्धिक असतात, अंतर्यामी असतात, शांत आनंदी असतात.
केळाच्या सालावरून पडल्यानंतर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अश्या लहानपणापासून आपसूक केलेल्या, झालेल्या निरीक्षणाचा परिपाक असतो. समाज, राष्ट्र, विश्वाविषयी दृष्टीकोण बनत जातात. त्याचे दृढीकरण होत जाते. त्यातुन प्रतिक्रिया उमटतात.
समुद्र शांत असला की त्याचा थांग लागतो पण तो खवळलेला असेल तर... मन विकारी आहे. ते विकारी असतेच. मुलतः त्याचा स्वभाव कष्ट करून मिळवण्याचा नसतोच. पण बुद्धीने केलेला विचार (भौतिक स्वतंत्र) जो मनावर नियंत्रण ठेवतो ते विचारी मन. आणि जो बुद्धीने केलेला विचार जो मनावर नियंत्रण ठेवत नाही त्याला विकारी मन म्हटले जाते.
म्हणजे ‘विचारी’ मनाचा ‘विकारी’ मनावर विजय असेल तर ‘मनाचा थांग’ लवकर लागतो. आणि ते ‘विकारी मन’ आपला हट्टीपणा सोडत नसेल तर ‘मन लहरी’ होत जाते. माझ्या मनाचा थांग मला लागला पाहिजे त्यासाठी मला विचारी, शांत व्हावं लागेल ! जमेल ना मला ? हो हो थोडे थोडे नक्की जमेल.
Categories: : Marathi Blogs, Psychology, मानसशास्त्र, All Categories