परीक्षा, आई-बाबा आणि मी

May 05, 2021 |
Twitter

मुलं / मुलींच्या अभ्यासात आई–बाबांची साथ कशी असावी ? विद्यार्थ्यांची मनोभूमिका परीक्षेच्या दिवसात कशी असावी ?

परीक्षा आणि आई-बाबा 

परीक्षा म्हटले की घरातील वातावरणच बदलते. अनेक जणांचे  विविध सल्ले अभ्यास, रात्रीचे जागरण, त्यांच्या मुलांनी केलेला अध्यास, मेहनत, खाणे-पिणे (diet), पेपरला जातांना exam centre वरील अफलातून अनुभव अगदी एक न दोन असंख्य बाबींवर घरात चर्चा नित्य होत असते. योग्य माहिती मिळणे जरुरी, पण अनावश्यक चर्चा नको. नेमके काय करावे, काय करू नये हे तेंव्हाच समजेल जेंव्हा त्यामागची नेमकी भूमिका समजेल.

मुलं / मुलींच्या अभ्यासात आई – बाबांची साथ कशी असावी ?

  • मुला/मुलींचे वेळेचे नियोजन आपण करू नये, त्यांना त्यांचे करू दिले पाहिजे .
  • काही कारणामुळे दोघांमध्ये वाद, आर्थिक, कौटुंबिक वाद, नोकरी, व्यवसायाचे ताण, किंवा अन्य ताण ज्याचा विशेष संबध मुलांशी नाही यामध्ये त्यांना गुंतवू नये. आणि त्याचा ताण त्यांच्या मनाला देवू नये (stress transfer).
  • घरातील वातावरण आनंदी, उत्साही असले पाहिजे याची काळजी घ्यावी.
  • संयमी, धोरणी वृत्ती आई वडिलांनी ठेवावी.
  • त्यांच्या मित्र, मैत्रिणींचे मार्कस किंवा अभ्यास विचारू नये. असे मार्क्स विचारले की त्यांच्या मनात आपण कमी आहोत अशी भीती विनाकारण निर्माण होते.
  • “मी तर खूप काळजी घेते, पण ह्यांना काहीच वाटत नाही / खूपच कडक स्वभावाचे आहेत.” किंवा “मी तर काहीच बोलत नसतो हीच फार मागे लागते त्यांच्या.” कुठे आईचा तर कुठे बाबांचा धाक असतो. आईने आईची व बाबांनी बाबाची भूमिका पेलावी, आई आणि बाबा दोघेही मुलांसाठी तेवढेच महत्वाचे. एकाने दुसऱ्याची पडती बाजू सांभाळून घ्यायची यालाच ‘माय-बाप’ म्हणतात.

परीक्षेच्या दिवसात मुला/मुलींची चिडचिड का होते ?

खरंतर हा प्रश्न प्रत्येक आई-वडिलांनी फार हळुवारपणे हाताळला पाहिजे. कारण परीक्षेचा जेवढा ताण आई-वडिलांना असतो त्यापेक्षा कैकपटीने हा ताण मुलामुलींवर असतो. हे समजून घेतले तरच चिडचिडीचे गणित सोपे होते. पण आई वडील कधी कधी मुलांनी चिडचीड केली तर त्रागा करतात.

  “आधी अभ्यास नाही केला... आता कशाला चिडचिड करता ? आता काय फायदा ?”

  “आता तुझे अभ्यासाचे दिवस आहेत फालतूपणा करू नको...”

  “काय झाले एवढे चिडायला...? तुझे आईबाबा आहोत आम्ही शोभते का असे बोलणे ?”

  “तू थोडे meditation करत जा ! रामरक्षा म्हण !” 

वगैरे...

असे अनेक प्रकारचे संवाद घरात होतात. या संवादाची फलश्रुती शून्य असते.

हे समजून घ्या –

मुला/मुलींना तुम्हाला अपमानित करायचे किंवा दुखवायचे नसते. त्यांना परीक्षेचा आलेला ताण, अभ्यासाची जुळवाजुळव, वेळेचे गणित, अभ्यासातील कठीण विषयाचे येणारे विचार, या विचाराच्या गुंतागुंती मध्ये ते गोंधळलेले असतात. यासाठी तुमचा आधार ही एक प्रकारची मदतच तुमच्या कडून त्यांना  हवी असते. अश्या वेळी हळूच विचारा – काय झाले बेटा ? अभ्यासाचा ताण येतोय का ? मी आहे तुझ्या सोबत म्हणजे आधीच परीक्षेच्या ताणाने गोंधळलेली मुले थोडे रिलॅक्स होतील. ही भूमिका पालकांची नेहमी असावी.

सकाळी उठवणे, ते ही तो/ती उठेपर्यंत, अभ्यासाला लागेपर्यंत त्यांना आपली खेळीमेळीची सोबत करावी. कारण मानसिक ताणामुळे त्यांना त्याची गरज असते.

विद्यार्थी ३ प्रकारचे असतात. १) खूप अभ्यासू २) मध्यम ३) कमी अभ्यास करणारे. असे जरी असले तरी परीक्षेच्या काळात प्रत्येकच विद्यार्थी ताणाखाली वावरत असतो. त्या त्या प्रकारची मदत त्यांना हवी असते.

काही पालक मुला/मुलींच्या परीक्षा आणि अभ्यास यासाठी एवढे उतावीळ झालेले असतात, त्यांची मनाची अवस्था एवढी शिगेला पोचलेली असते की त्यांना वाटते आपणच त्यांचा अभ्यास करून पेपर देऊन यावे की काय. मग मुलामुलींनी थोडाही TV पाहणे, मित्र मैत्रिणींशी बोलणे, मोबाईल हातात घेणे, यांनी पालकच चिडचिडे होतात.

एक – दीड तासाच्या वर जर यात वेळ जात असेल तर नक्की विचार करावा व त्यांच्या संमतीने शिस्त बद्ध उपाय योजना करावी.


परीक्षा आणि मी


विद्यार्थ्यांची मनोभूमिका परीक्षेच्या दिवसात कशी असावी – 

  • हा एक दोन महिन्यांचा वेळ माझ्यासाठी महत्वाचाच आहे.
  • जो अभ्यास झाला त्यावर लक्ष केंद्रित करायचे.
  • जो lesson/topic आधी एक-दोन वर्षात कधी वाचलाच नाही तो आता वेळेवर prepare करू नये. त्यात वेळही जातो आणि तेवढ्या वेळात revision चा बराच अभ्यास होतो.
  • Revision चे वेळापत्रक करायचे त्या नुसार अभ्यास करायचा.
  • जो अभ्यास झाला त्यावर लक्ष केंद्रित करून मी चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवू शकतो हा विचार नेहमी मनात आणायचा.
  • प्रत्येक विद्यार्थी हाच विचार करतो की माझा अभ्यास पूर्ण झाला नाही. अजून हे वाचायचे राहिले, ते सोडवून पाहायला पाहिजे, असे विचार मनात येणे म्हणजे “माझा काहीच अभ्यास झाला नाही” हा विचार चुकीचा. अश्या विचारांनी परीक्षेची उगीच भीती वाटते.

परीक्षेची भीती का वाटते ?

बाप रे... आला परीक्षेचा दिवस ! म्हटले की धडकी भरते, पोटात गोळा उठतो, हातपाय लटपटतात, घाम सुटतो वगैरे वगैरे... बरोबर न !

पण अशी भीती वाटूच नये हा विचार चुकीचा. अशी थोडीफार भीती सगळ्यांना वाटणारच.

माझ्या सारखे पाच लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्वांनी अभ्यास केला आहे तरी सर्वाना अशी भीती वाटत आहे. मी एकटाच नाही.

बऱ्याचदा विद्यर्थ्याला असे वाटते की माझा अभ्यास कमी झाला आहे माझ्या पेक्षा माझे मित्र व इतरांचा अभ्यास चांगला झाला आहे. मी दोन वर्षा पासूनच अभ्यास करायला हवा होता. खूप वेळ वाया घालवला. हा आत्ता आला असा seriousness मागच्या वर्षी पासूनच हवा होता. आता काय उपयोग वेळ हातातून निघून गेला....

पण असे नसते. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या, मनाच्या, शरीराच्या व चित्ताच्या (स्वभावाच्या) क्षमते प्रमाणे अभ्यास केलेलाच असतो. तुम्ही किती अभ्यास केला हे तुम्हाला माहित असते. पण आता मात्र ‘ते’ मन स्वीकार करत नाही. फक्त मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे आणि पाहिजे त्या कॉलेज मध्ये admission मिळाली पाहिजे अशी भूमिका झालेली असते. ती मिळणार का नाही ? या द्वंद्वात वरील सर्व चुकीचे विचार तुमचे moral down करतात. तराजूच्या एका पारड्यात परीक्षेचा निकाल आणि दुसऱ्या पारड्यात जीवन अशी अटीतटीची भूमिका ठेवतात.

  त्यापेक्षा “मी बराच चांगला अभ्यास केला आहे, त्या बळावर मी छान पेपर सोडवू शकतो/शकते आणि कॉलेजची admission मिळणे किंवा मिळवणे हा एक जीवनाचा भाग आहे ‘ते’ म्हणजे जीवन नाही. मी यापेक्षाही जास्त चांगले काही करू शकतो. या परीक्षेतही मला चांगले करता येते व करायचे आहे. म्हणजे, 'परीक्षा एक भयानक प्रसंग' अशी मनाची बिकट अवस्था होत नाही.

उलट परीक्षा म्हणजे ‘उत्सव’ आपण एख्याद्या कार्यक्रमाची खूप छान तयारी करतो आणि कार्यक्रम जसजसा जवळ येतो आपली उत्सुकता वाढते. आणि कार्यक्रमाचा दिवस आपण उत्साहात साजरा करतो. त्याचा आनंद घेतो, का असे म्हणतो - “बाप रे... आज कार्यक्रम, कसे होणार ? बहुतेक सगळे बिघडणारच वाटते वेळेवर...!” नाही ना ! जे जे काही अडचण येणार असे असते त्याची त्याची आपण आधीच सावधपणे काळजी घेतलेली असते. तशीच काळजी परीक्षेची पण घेतलेली असते.  

मग पेपरच्या दिवशीच असे विचार का ? पेपरचा दिवस हा उत्सुकतेचा दिवस, हा विचार असेल तर ‘परीक्षा म्हणजे भीती हे समीकरणच नाहीसे होते’. अगदी असे सहज परीक्षेकडे पहा .

 परीक्षेचा दिवस खूप छान आहे, जीवन त्याही पेक्षा सुंदर आहे.

 असा विचार बघा करून !

Categories: : Marathi Blogs, All Categories