एकाग्रता म्हणजे काय ? ती कशी मिळायची ? विद्यर्थ्यानाच एकाग्रतेची गरज आहे ? बाकी व्यक्तींना फार विशेष गरज नाही ?
एकाग्रता म्हटले की समोर दिसतात ते फक्त विद्यार्थी. आपला असा ठाम समज आहे की विद्यर्थ्यानाच एकाग्रतेची गरज आहे. बाकी व्यक्तींना फार विशेष गरज नाही. परीक्षा… अभ्यास… मार्क्स… स्पर्धा… किती आवश्यकता आहे त्यांना एकाग्र चित्ताची ?
कोणी ही पालक भेटले की, त्यांची सर्वात पहिली समस्या असते मुलांमध्ये एकग्रता नाही. “आम्हाला माहित आहे त्याची बुद्धी फार चांगली आहे. पण टिकून अभ्यासच करत नाही.” जेंव्हा आई-वडिलां सोबत मुलं असतात तेंव्हा त्यांना तर काहीच समजत नसते. कारण नेमकं एकाग्रता काय रसायन आहे हे त्यांच्या जिज्ञासू बुद्धीला अजूनही पल्ली पडलेलं नसतं. अनेक विद्यार्थी सुद्धा अभ्यास न होण्यामागे एकाग्रता होत नाही अशी धारणा करून निराश होतात आणि अपेक्षित यशापासून दूर जाऊन ताणतणावाखाली येतात.
आधुनिक दैनंदिनी मध्ये आपण एकाग्रतेची व्याख्याच बदलून टाकली आहे. एकाग्रता म्हणजे तासंतास एका जागेवर बसून, इकडे-तिकडे न बघता अभ्यास करणे आणि पहिल्या क्रमांकात येणे. १२वी म्हणजे, MPSC, UPSC चा अभ्यास म्हणजे फार Concentration पाहिजे. इथेच आपण फसतो, फसवितो, स्वतःला गुलाम करतो. आणि गुलामी म्हणजे ध्यास नव्हे, एकाग्रता नव्हे.
आई-बाबा, मावशी, काका मुलांना अर्जुनाचा बाण आणि पोपटाचा डोळा किंवा विवेकानंदाची गोष्ट सांगतात. आमच्या पणजोबा पासून पोपटाचा डोळा आणि एकाग्रता हे समीकरण चालू आहे. कळणारे कळून पुढे जातात, ते फार थोडे. आमच्यासारख्या बाकीच्यांचं काय ? म्हणून बघू एकाग्रता म्हणजे काय ?
एकाग्रता म्हणजे सर्वप्रथम मनाला बुद्धीने एक विषय द्यावा लागतो. त्या अनुषंगाने नियोजन करावे लागते. उदाहरणार्थ मला अमुक विषयाचा अभ्यास करायचा, किंवा या कार्यक्रमाची तयारी करायची, विदेशवारी करायची, असे. त्यानुसार नियोजन. एकाग्रता आपोआप साध्य होणारी गोष्ट नाही. ती कशी मिळायची त्याचे शास्त्र आहे. एकग्रता साधण्यासाठी तीन अडथळे येतात.
१) निर्णय शक्तीचा अभाव.
२) मनाचे भटकणे.
३) जेवढी बुद्धीची क्षमता आहे त्यापेक्षा कमी क्षमतेचा वापर करणे.
आपण उदाहरण घेऊ -
एखादा विद्यार्थी आहे, घटकेत त्याला गणिताचा अभ्यास करावा वाटतो तर घटकेत हिंदी. कधी वाटते झोपू कधी वाटते वाचू… याचा अर्थ त्याच्यात निर्णय क्षमतेचा अभाव आहे. तो कसा दूर करायचा ? तर वारंवार स्वतःसाठी निर्णय घेऊन त्यावर कृती करून निर्णय क्षमता वाढवावी लागते. कोणताच निर्णय अचूक/योग्य किंवा चूक/अयोग्य नसतो. निर्णय घेऊन त्यावर कृती केल्यावरच समजते की तो बरोबर आहे किंवा चूक.
एकाची ही समस्या आहे की, त्याला दुसरे पुस्तकाचे पान वाचले तर पहिल्या पानावर काय वाचले हे आठवतच नाही. असे वाचून काय उपयोग ? म्हणजे त्याचे मन भटकत असते. डोळे शब्द वाचत असतात आणि बुद्धी आकाशातल्या चांदण्या मोजत असते. म्हणजे हातात काम एक आणि बुद्धीत विचार दुसरे. मग एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याला अर्थ लावून अर्थपूर्ण वाचन कुठले ? ह्याला मनाचे भटकणे म्हणतात. हे मनाचे भटकणे कसे थांबवावे ? यावर उपाय एकच बुद्धीने वारंवार मनाला जागेवर आणायचे. स्वतःला बजावून सांगायचे, मी आता हे काम करत आहे, हा अभ्यास करत आहे, ते मला पूर्ण करायचा आहे. असे करता आले नाही तर कुशाग्र बुद्धी असूनही उपयोग नाही.
काहीजणांची अशी समस्या असते की त्यांचे वाचन,मनन अर्थपूर्ण असते. सगळे समजते पण थोड्या दिवसांनी आठवत नाही. याचे कारण त्यांनी बुद्धीच्या पूर्ण क्षमतेचा वापर प्रयत्न पूर्वक, कष्टाने केलेला नसतो. बुद्धीची पूर्ण शक्ती वापरण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. क्षीण बुद्धी किंवा तीक्ष्ण बुद्धी घेऊन सर्वसामान्य माणूस जन्माला येत नाही. त्या बुद्धीचा आपण किती कष्ट घेऊन वापर करतो त्यावर सफलता निर्धारित असते.
लहानपणापासून किंवा नंतरही जाणीवपूर्वक असा स्वभाव घडवता येतो. असा स्वभाव घडवला नाही तर बुद्धी असूनही त्या व्यक्तीस वारंवार असफलता येते. एक काम नेटाने, प्रयत्नपूर्वक, न कंटाळता त्यात नाविन्य निर्माण करून, त्यात मन रमवून आनंद घेत करता येणे म्हणजे एकाग्रता.
अशी एकग्रता गृहिणी, वकील, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक, गायक, चित्रकार, लेखक, कवी सर्वाना हवीच ना ! प्रत्येकाला वारंवार स्वतः निर्णय घेवून त्यावर कृती करावी लागते. बुद्धीने मनाला वारंवार जागेवर आणावे लागते. आणि बुद्धीच्या पूर्ण क्षमतेचा प्रयत्न पूर्वक वापर ही करावा लागतो. ह्या प्रक्रियेला एकाग्रता म्हणतात.
प्रत्येक कला, गुणांच्या विकासासाठी जशी एकग्रता लागते तशीच रोजच्या दिनचर्येत सुद्धा एकग्रता लागतेच. ऑफिसची तयारी असो किंवा स्वयंपाकाची. एवढेच कशाला ड्रेसवर मचिंग निवडतांना, जेवणात एका नंतर दुसरा घास खातांना, जिन्याच्या पायऱ्या उतरतांना... एकाग्रता हवीच नाहीतर पाय घसरून पडायला वेळ लागत नाही...!!
एकाग्रता जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो जीवनाचा आस्वाद आहे.
Categories: : Marathi Blogs, All Categories