काय आहे बरं हा ‘च’ चा रोग. आपल्याला आहे का ? बघू…
आम्ही मित्र कुटुंबसह ट्रीपला गेलो होतो. खूप धमाल करायची, अगदी वर्ष सहा महिन्याचा शीण घालवायचा असे बेत आखले. सकाळी १०ची रेल्वे होती. आमची वेळेवर रेल्वे स्टेशन वर पोचण्याची लगबग. नितीन, माधवी आणि मुलं आमच्याकडे येणार मग आमचे दीर आम्हाला स्टेशनवर सोडणार असे ठरले. ते आल्याबरोबर आम्ही निघालो.
कार मध्ये नितीन माधवीला, “तुझी न, ही नेहमीचीच सवय. अगदी वेळेवरच तुला कामं सुचतात.” रेल्वेला यायला अवकाश होता. लगेच माधवीचे चालू झाले, “बघा म्हटलं ना, पोचतो वेळेवर पण माझे तुम्ही ऐकणारच नाही कधी.” रेल्वे आली, आम्ही व्यवस्थित रेल्वेबोगीत जागेवर समान लावले आणि हुश्श...! सगळे आनंदात मज्जेत निघालो. दुपारी मस्त जेवणाचे डबे बाहेर निघाले. खमंग घमघमाट सगळ्या बोगीभर पसरला. रेल्वेत जेवणाची मजा भन्नाटच. घरच्या पेक्षा जास्त चवदार लागतात पदार्थ. मी भेंडीची भाजी मटकीची उसळ घेतली होती. पण माधवीच्या सौरभने काही म्हणून घेतले नाही. माधवी म्हणाली, “तो ना भेंडीची भाजी खातच नाही. अगदी मोजक्याच भाज्या खातो. सॉस शिवाय होतच नाही त्याचे. आणि ह्यांना तर जेवणात लोणचं लागतच. प्रवासात सुद्धा सौरभ साठी सॉस आणि ह्यांच्यासाठी लोणचं मी घेतेच.” मी मात्र सगळे ‘च’ शोधत बसले, माझ्या खोडेल स्वभावा प्रमाणे.
पिंकीला डव्ह साबणच लागतो. ठरलेलं टी-शर्टच ह्यांना पाहिजे. आमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरलेलीच असते. किती हे ‘च’... हेच पाहिजे, असेच पाहिजे... पण थांबा ! खरा धोका रेड सिग्नल तर अजून मिळालाच नाही. तो तर पुढे आहे. हे ‘च’ मुलांना फाजील हट्टी, वडिलांना नको इतके कठोर आणि आईला फालतू महत्वकांक्षी बनवतात. मग एवढे मार्क्स मिळालेच पाहिजे, एवढा पैसा असलाच पाहिजे, मुलाचा नंबर या कॉलेज मध्ये लागलाच पाहिजे, माझी प्लेसमेंट अशी झालीच पाहिजे, त्यासाठी आईची घालमेल, वडिलांची कडक शिस्त, आणि मुलांचा/मुलींचा हट्ट. थोडे खुट्ट झाले यात की सगळे कुटुंब सैरभैर होते. म्हणतांना म्हणतात, आमची खूप अपेक्षा नाही एवढेच वाटते की त्याचे ‘future’ चांगले व्हावे बाकी काही नाही.
एक मुलगा अतिशय भोळा, सरळ स्वभावाच्या चेहरे पट्टीचा माझ्याकडे आला. खूप निराश, गंभीर नजरेला नजर देणे सुद्धा त्याला गुन्हेगारा सारखे वाटत होते. डोळ्यात वेदना, आणि अगतिकता तर होतीच त्याच बरोबर होती भावना शून्यता जी मला जास्त दाह्कतेने जाणवत होती. एक शब्द बोलणे सुद्धा जड जात होत. “काय म्हणतो बेटा, कसा आहेस”. थोडे आपलेपण वाटल्यावर म्हणाला, “माझ्या सर्व मित्रांना खूप चांगले जॉब मिळाले. मला नाही. मी इंटरव्ह्यू मध्ये select च नाही होत. कारण मी खूपच साधा आहे. मला बोलताच येत नाही बरोबर. माझी इंग्लिश भाषाच नाही इम्प्रेसिव्ह, स्मार्टनेसच नाही माझ्यात. आणि बाकी मुले खूपच चांगले करतात हे सर्व. माझे तर सगळे जीवनच खराब झाले. आई बाबा म्हणतात बँकेत नोकरी कर. मी एवढे शिकलोच कशाला मग. साधे बीकॉम केले असते तर बरे झाले असते. वेळ, पैसा, कष्ट सगळेच वाया गेले.”
म्हणजे मला कंपनीत चांगल्या package चा job मिळालाच पाहिजे. तसे नाही झाले म्हणजे मला काहीच येत नाही. विचारात किती मोठी चूक आहे ही ! पण त्यावेळी त्या परिस्थितीत हे सर्व ‘च’ माझ्या भोवती एवढा पिंगा घालत असतात की त्यातून बाहेर पडूच शकत नाही आपण अशी प्रबळ भावना पक्की होते. त्यातून येते नैराश्य.
एकदा नेहमी प्रमाणे आमचे दोघांचे भांडण झाले. ह्यांनी माझ्यावर ‘च’ चाच हल्ला केला. “तुला वाटते तुझेच खरे, तुलाच सगळे समजते, बाकी घरातले सगळेजण मूर्ख.” मी सुन्न झाले. विचार केला खरचं असे वागतो का आपण ? कधी ऐकतच नाही का ? आणि त्या दिवसापासून प्रत्येक प्रसंगी “मीच खरी” हा माझा विचार पडताळून पाहते. बोलावे वाटले तरी गप्प राहते, समोरच्याला संधी देते.
‘माझेच खरे’ हा माझा भाव नसला तरी व्यक्तीचा ‘सुपरह्युमन सिंड्रोम’, दुसऱ्याचे थोडेही नुकसान होवू नये म्हणून वेळेच्या आधीच इतकी तत्परतेने काळजी घेतो की ‘तो’ त्या व्यक्तीचा हट्टीपणा होवून जातो. थोडं सोडून दिले दुसऱ्यावर तर जास्त चांगलं होतं…
हे ‘च’ जीवनाचा भाग बनून जातात नकळत. पेपरची घडी अशीच ठेवली पाहिजे, घरात असेच झाले पाहिजे, मुलांना काळजीच नसते, नवऱ्याला कौतुकच नाही, बॉस दुष्टच आहे, नातेवाईक बोगसच असतात, सरकार/शासन बेवकुफच असते, राजकारण मूर्खाचा बाजारच असतो, असे अति भयंकरीकरण कोणत्याही गोष्टीचे करतो आपण. अगदी या मुलीने माझ्यावर प्रेम केलेच पाहिजे, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलीच पाहिजे. असे सुद्धा ठरवतात मुलं.
प्रत्येक गोष्टीतून काहीतरी मिळालेच पाहिजे हे नियम बनवत जातात व्यक्ती. कुठल्याही गोष्टीत कमी अधिक झाले तर अस्वस्थ होतात. असे झाले की सगळे अश्यक्य वाटायला लागते. मग पुढचा रस्ता दिसेनासा होतो. ह्याला काही पर्याय आहेत का ? हे शोधण्याची बुद्धी किंवा मनात विचारही येत नाहीत. घटस्फोट, आत्महत्या, असे टोकाचे निर्णय घेतात.
बॉस माझ्यावर रागवू शकतो...मी मस्त कॉफी घेईन ! घरात पसारा झाला तर...मुलांच्या चेहऱ्यावरील अनंद टिपून घेईन ! स्वयंपाकात पदार्थ बिघडला तरी माझ्यावरील कुणाचे प्रेम बिघडणार नाही ! नापास, कमी मार्क्स मिळू शकतात...पण माझी खिलाडू वृत्ती, मित्रभाव, मनाचा मोठेपणा कमी होणार नाही ! नोकरी मिळण्यास उशीर होवू शकतो, पैसा कमी होवू शकतो... जीवनात अशा परीक्षा देऊन मोठे व्हावे लागते ! असे मोठे व्हायला मला आवडेल ! शिक्षण अर्धवट सुटू शकतं... काहीतरी दुसरे करू जे अजून चांगलं असेल माझ्यासाठी !
आजपासून आपण आपले असे ‘च’ शोधू. कोणते ‘च’ रेड सिग्नल देतात, ते काढून टाकू. बघू माझ्यात काही चंगला बदल होतो का ?
जेंव्हा प्रसंगांना असे सामोरे जावू तेंव्हा त्यातून हास्य, विनोद, आणि असंख्य मार्ग मिळतात. जे जीवनाला योग्य दिशा दाखवतात आणि मनापासून जीवन जगण्याचा अमुल्य आनंद देतात. जीवनाचा आनंद महत्वाचा तो मिळाला म्हणजे बस्स ..!!
Categories: : Marathi Blogs, All Categories