आयुष्यात असे प्रसंग खूप येतात. अरे बापरे ..! अब्रू वर हल्याचे नाही हो, आपल्या भिडस्त पणामुळे, भिडेला बळी पडण्याचे.
माझ्या जवळ ५० रु.फाटकी नोट होती. कुणाला द्यावी बरे ही… भाजीवाल्याला ? नको नको. गरीब बिचारा. बी.सी.मध्ये दे (नवऱ्याचा सल्ला). पण..बायका काय म्हणतील ? काय बाई आहे ! फाटकी नोट दिली ! लग्नाच्या आहेराच्या पाकिटात टाकते… नको नको.. त्यावर तर नाव पण असते आपले. ठेवून ठेवूनच फाटून जाईल ती आता.
केवढा भिडस्तपणा…! ती नोट तुम्ही फाडली का ? मग काय एवढा विचार करता ? ५०रु. चे स्वतःचे नुकसान कबुल, पण बाजारात फाटकी नोट चालवता येत नाही आपल्याला.
एकदा दुकानात गेले. माझा साड्या घेण्याचा शौक चणाक्षपणे ओळखणारा सेल्समन, मला वेगवेगळ्या शे पाचशे साड्या दाखवल्या. “हे बघा मॅडम, हा लेमन यलो एकदम झकास. आणि हा पिच तर एकदम डीसेन्ट, आवडेलच तुम्हाला. तरी माझा सूर न मिळाल्याने त्याने, “हे बघा या एकदम नवीन, आत्ताच आल्या मार्केटला.. अजून कॉस्टिंग पण नाही टाकले...
तुमच्यासाठीच फोडलं हे पार्सल...” एकाने तर साडी नेसून स्टाईलिश चालून पण दाखवले. शेवटी तर मुख्य दुकानदार उठून आले ! “काय ताई, आज चॉईस होत नाही वाटते साडी. अरे… त्या पलीकडच्या रॅक मधल्या Special Designer साड्या दाखव..” त्या Special माझ्यासाठी आणल्या. मी पण लाजे काजे एक निवडली. तर दुकानदार म्हणतो कसा ? “एकच ? अहो ताई, फार छान आहे हा लॉट, पुन्हा येणार नाही अश्या..” मी पुन्हा त्या ढीगभर साड्या मधील (लॉट) खालच्या वर वरच्या खाली करून अजून एक घेतली. एवढ्या साड्या पाहिल्यावर एकच घेतली, काय म्हणतील हे लोकं - काय कुचकट बाई आहे ? एवढा वेळ दाखवून एक साडी घेतेय...!
मग चांगलं ३००० रु. बिल करून माझी स्वारी दुकाना बाहेर. हुश्श... घरी येतांना विचार केला. फालतूच भरीस पडले. एवढ्या काही चांगल्या नाहीत साड्या. ३००० रु. बिल झालं शिवाय. हट्... मग मैत्रीणीना दाखवल्या. त्यांच्या चांगल्या comments तरी सुखावतील मला या आशेने !
पण का ? का भीड बाळगतो अशी आपण ? मी नाही म्हणनं म्हणजे माझी बेअब्रू. एकदा करून पहा असा अब्रूवर हल्ला बोल…! दुकानात जा आणि सगळ्या साड्या पाहून मला एकही आवडली नाही असे म्हणून या....बघू काय होतं.
एकदा आम्ही मित्रकडे जेवायला गेलो. आंबट आंब्याचा रस, कडक पुऱ्या, तिखट भाजी आणि थंड भात असा मेनू. काय खावे कळत नव्हते. तरी पण रसाचा आग्रह. पुरे पुरे म्हणे पर्यंत ताटात पुऱ्या. काय वाटेल त्यांना आपण खाल्ले नाहीतर असे म्हणून, नाही नाही म्हणत आम्ही दोन–तीन वाट्या रस “अरे वा ! छान झाला !” म्हणत (आनंदाने) पिला. नंतर दोन दिवस पोटाचे बारा वाजले…!
का करतो आपण असे स्वतःचे नुकसान ? मला त्रास होतो आंब्याच्या रसाने, घेतो ना मी थोडा, असे म्हणून निभावता आले असते. आणि दोन दिवस त्यांना मनातल्या मनात शिव्या देवून कुठे नाते जोपासले ? दिवाळीच्या फराळाच्या वेळी तर ह्या भिडस्त माणसांच्या शोधातच असतात लोकं. बरेच काही देतात डिश भरून. आपणही वा छान झाले सर्व ! म्हणत डिश संपवतो. नाही म्हटले तर आपल्याला नावे ठेवणार... हा धोका पत्करायची तयारी नसते आमची.
आम्ही, आमची अब्रू जाईल, इतक्या तळमळीने ही भीड जोपासतो. का तर लोकांनी माझ्या बद्दल गैरसमज करून घेऊ नयेत म्हणून. ह्यात लाज जाण्यासारखे काय ? पण इतकी कवच कुंडले बनवलेली असतात आम्ही स्वतः भोवती की ती तोडणं म्हणजे आमची प्रतिष्ठा धोक्यात येते. ही कवच कुंडले आपले अस्तित्व सुद्धा धोक्यात आणतात कधी कधी...
शाळा किंवा कॉलेज मधला मुलगा मला नोट्स मागतोय. त्याला देणं माझे काम, रात्री ११ वाजले तरी बेहत्तर पण मी नेवून देईल. पण नाही म्हणणार नाही. का ? त्याला दुसरे मित्र मैत्रीण नाहीत ? नाही पण आपलीच ‘इमेज’ खराब होईल. त्याने बिचाऱ्याने एवढी request केली आणि द्यायचे नाही म्हणजे काय ?
माझा Best friend, “अरे..थोडी घे, आजच्या दिवस.. Birth day न माझा… काय यार तू म्हणजे कुक्कुलं बाळ…” लगेच आपली इज्जत जाते, मोठेपणा कमी होतो, मागासलेपणच येते, हो ना !
इतकेच कशाला ? Chating ला reply दिलाच पाहिजे, मेसेज वाचलेच पाहिजे, काय म्हणतील. “कशाला राहतो ग्रुप मध्ये ?” Facebook ला like केले नाही तर काय म्हणतील ? “साधं like देत नाही !” आणि मग आपल्या post like कोण करील..? म्हणजे आपल्या post ला पसंती मिळावी आणि नाही मिळाली तर केवढी बेअब्रू...!
‘तसे’ मी केले नाही तर लोकांच्या मनातून मी उतरून जाईल. “इतरांच्या मनात काय आहे.” हे गृहीत धरून काम करतो आपण. असे कितीतरी Social Blocks या मुळे तयार करतो. मग वस्तूची खरी किंमत सांगण्यासाठी, वर्गात प्रश्न विचारण्यासाठी भितो. चुकले तर काय ? गेली इज्जत...
एकदा असे कठोर व्हा. नाही म्हणा अश्या वेळी जेंव्हा तुम्हाला मनातून ते आवडत नाही. ह्याचा अर्थ उद्धट होणे नाही, दुसऱ्यांना जाणून बुजून वाईट म्हणणे ही नाही. कित्तेक मुलं ,मुली, बायका, ऑफिस कर्मचारी अशा सवयी मुळे नैराश्येच्या आहारी जातात. वरील उदाहरणे जरी साधी वाटत असली तरी त्याचेच अनेक घटना, प्रसंग गुंफून एक मालिका तयार होते, घट्ट...
असे कुठे कुठे Social Blocks तयार केलेत आपण याचा शोध घ्या. ज्याचा त्रास होतो. त्यावर हल्ला बोल करा नक्की. असा हल्ला ज्यातून माझी प्रगती होते, ज्यामुळे मला शिस्त-वळण लागते, नेमकेपणा येतो, आणि सर्वात महत्वाचे माझा विश्वास वाढतो, माझ्यावरचा आणि इतरांवरचा ही...
Categories: : Marathi Blogs, All Categories